🔥 TRENDING पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानंतर... Woman Walks Out of Mirzapur Movie Scre... Brett Lee Urges India to Ease Pressure... Indian Duo Satwik and Chirag Reach Chi... Ali Fazal surprises fans at Mirzapur:... Samay Raina’s rumored girlfriends spar...
06 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
तांत्रिक अडचणींच्या निषेधार्थ ७ सप्टेंबरला ई-पॉस मशीन बंद ठेवणार; रत्नागिरी जिल्हा रेशनिंग संघटनेचा निर्णय
Local

तांत्रिक अडचणींच्या निषेधार्थ ७ सप्टेंबरला ई-पॉस मशीन बंद ठेवणार; रत्नागिरी जिल्हा रेशनिंग संघटनेचा निर्णय

✍️ Reporter: Aniket Mestri 🗓 06 Sep 2026, 12:44 PM 👁 7
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ई-पॉस मशीनमधील वारंवार उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे परवानाधारक आणि शिधापत्रिकाधारकांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधण्यासाठी ७ सप्टेंबर रोजी राज्यभरात ई-पॉस मशीन बंद ठेवण्याचा निर्णय रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक-मालक संघटनेने घेतला आहे.

रत्नागिरी: केंद्र शासनाच्या एनआयसी (NIC) माध्यमातून ई-पॉस मशीनवरील इंटरनेट सर्व्हरची सेवा गेल्या काही महिन्यांपासून वारंवार विस्कळीत होत आहे. या तांत्रिक अडचणींमुळे परवानाधारक आणि शिधापत्रिकाधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकान परवानाधारकांनी ७ सप्टेंबर २०२६ रोजी दिवसभर ई-पॉस मशीन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक-मालक संघटनेने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

या गंभीर समस्येबाबत संबंधित प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही अपेक्षित सुधारणा झालेली नाही. राज्य फेडरेशनच्या वतीने यापूर्वी लेखी स्वरूपात निवेदन देऊनही त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यभरातील जिल्हा, शहर, तालुका तसेच ग्रामीण भागातील रास्त भाव धान्य दुकानदारांनी एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन पुकारले आहे.

रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक-मालक संघटनेच्या बैठकीत या आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. संघटनेच्या आवाहनानुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील संपूर्ण जिल्हा व तालुका संघटना ७ सप्टेंबर रोजी ई-पॉस मशीन बंद ठेवून राज्य फेडरेशनच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. ई-पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून धान्य वितरण व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी संघटनेने केली असून यासंदर्भातील निवेदनाची प्रत अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनाही पाठवण्यात आली आहे.
📲Get App